Monday, November 9, 2009

मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य- जैमिनी कडू Print
जळगाव, २ नोव्हेंबर / वार्ताहर
मराठा साहित्य हेच मुळात मराठी साहित्य आहे, तसेच मराठी ही भाषा मुळात मराठा असून भाषा हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने मराठा भाषा असे संबोधले जात नाही, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी येथे केले. येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे जिल्हा बँकेच्या सभागृहात आयोजित सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. गेल ऑमवेट यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू यांनी मराठा साहित्य, मराठी भाषा अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. शैला जैमिनी, खा. ए. टी. पाटील, आ. संजय सावकारे, मराठा सेवा संघाचे अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडकर, नेताजी गोरे, सुधीर सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा स्मिता ढिकले, प्रविण गायकवाड, रामनाथ सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्याप्रमाणे गुजराथी, पंजाबी, बंगाली, बिहारी, कानडी, आसामी, चीनी, जर्मनी भाषांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो, त्याप्रमाणे मराठा भाषा ऐवजी मराठी भाषा असा उल्लेख करण्यात येतो.
मराठा व मराठी हे शब्द जातवाचक नसून ते भाषा वाचक, प्रांत वाचक असल्याचे प्रा. कडू यांनी सांगितले.
ज्या भौगोलिक प्रदेशात जी भाषा बोलली जाते, त्या भाषेवरूनच भारतात प्रांतरचना झाली. परंतु प्रांतरचना भाषेवरून करताना राजकारण्यांनी मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील अनेक मराठी भाषिक गावे महाराष्ट्राला जोडण्याचा मोठा गुन्हा केला असून त्याची फळे आज आपण भोगत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा साहित्यिकांना डावलण्याचे कारस्थान वर्षांनुवर्षे सुरूच असून सोप्या भाषेत मराठी जनांना जगण्याची व्याख्या सांगणाऱ्या तुकोबांनाही या दिव्यातून जावे लागले, तसेच एकूणच मराठी साहित्यावर ब्राह्मणीकरणाचा प्रभाव दिसून येत आहे, असे मत डॉ. गेल यांनी मांडले. ‘परिवर्तनवादी साहित्य चळवळीचा समन्वय आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक साहित्य परिषदेचे प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर हे होते. डॉ. गेल यांनी प्रस्थापितांविरुद्ध तोफ डागली. मराठी संत साहित्यात असलेले ब्राम्हणीकरणावर त्यांनी हल्ला चढविला. तुकोबांना गुरूची गरज नव्हती असे सांगत त्यांनी ‘ईडा पिडा जावो व बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना त्यांनी केली.
शोषणविरोधी मूलतत्त्वाने संघटित होण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 01, 2009 AT 11:00 PM (IST)

जळगावात मराठा साहित्य संमेलनाचे थाटात उद्‌घाटन

जळगाव - महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याची शिक्षण व्यवस्था, शिक्षणाचे धोरण बहुजनांच्या हाती दिले असते, तर राज्यात ज्या जाती- जातींच्या भिंती आहेत, त्या राहिल्या नसत्या. त्या दूर करण्यासाठी प्रत्येकाने वाचनसंस्कृती वाढविली पाहिजे. संमेलनातून समतावादी व समन्वयवादी धोरणाची अपेक्षा आहे. आपण सर्व शोषणविरोधी समतावादी मूलतत्त्वाने संघटित झाले, तर एक उज्ज्वल भवितव्य निर्माण करण्याचे श्रेय आम्हाला निश्‍चितच घेता येणार आहे, असे प्रतिपादन प्रा. जैमिनी कडू यांनी आज येथे केले.

येथील मराठा सेवा संघप्रणीत जगद्‌गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेतर्फे रविवारी सहाव्या मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन क्रांती वीरांगना कॅप्टन लीला पाटील साहित्यनगरीत डॉ. गेल ऑमवेट (नवी दिल्ली) यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात प्रा. कडू बोलत होते. कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रतीकात्मक नांगरावर पुष्प उधळून जिजाऊंच्या जय जयकारात उद्‌घाटन झाले. या वेळी लॅपटॉप, लेखणी ठेवण्यात आली.

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनिअर व ऍड. पुरुषोत्तम खेडेकर, खासदार ए. टी. पाटील, महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे, आमदार संजय सावकारे, परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. साहेब खंदारे, सौ. शैल जैमिनी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा ढवळे, मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष इंजिनिअर नेताजी गोरे, ब्रिगेडिअर सुधीर सावंत, "शिवधर्मा'चे देवानंद कापसे, शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पप्पू पाटील- भोयर, संघाचे प्रदेश सचिव विजयकुमार ढुगे, परिषदेचे महाराष्ट्र सचिव प्रा. दिलीप चौधरी, परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पाटील व्यासपीठावर होते.

प्रा. कडू म्हणाले, की महाराष्ट्र स्थापनेनंतर शिक्षणाची धोरणे तयार करण्याची जबाबदारी बहुजनांना कमी लेखणाऱ्यांच्या हातात गेली. त्यांनी बहुजनांना कमी लेखून बहुजनांचा विकास न होता, ते आपल्याच आधिपत्याखाली कसे राहतील याचा विचार केला. त्याचे वास्तव चित्र समाजासमोर येऊ दिले नाही. यामुळे आज सांस्कृतिक विचारांची दरी निर्माण झाली. त्यास आपण सर्व दोषी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो, तेव्हा आजची पिढी शिवाजी महाराजांचे नाव ठीक आहे. मात्र, इतरांचे काय, असा प्रश्‍न करतात. या विचारांच्या दरीला शैक्षणिक धोरण जबाबदार आहे. बाराखडीतला "भ' भटजीचाच का शिकविला गेला, भोवऱ्याचा का नाही?, "ग' गणपतीचा का शिकविला गेला, गवताचा का नाही?

ते म्हणाले, की सर्व महापुरुषांचे विचार आपण समजून घेतले, तरच जीवन कळणार आहे. पाच हजार वर्षांपासून जो माणूस आहे, त्याला सामाजिक प्रतिष्ठा त्याला नाही. ती प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आमची धडपड आहे. शोषणाचा विरोध व समतेची स्थापना, हे आमचे ध्येय आहे. भगवान गौतम बुद्धांनी मनाचा विचार करून धम्म सांगितला.

मराठा साहित्य समजून घ्यावे

मराठी भाषा ही मुळात मराठा भाषा आहे. भाषा हा शब्द स्त्रीलिंगी असल्याने "मराठा भाषा' असे संबोधिले जात नाही. मराठा- मराठी हे शब्द जात-वाचक नसून, ते भाषावाचक, प्रांतवाचक आहेत. आम्हाला आमचे अस्तित्व निर्माण करायचे आहे. आमचा माणूस आम्हाला मोठा करायचा आहे. जोपर्यंत ही भावना आपल्यात भिनत नाही, तोपर्यंत ब्राह्मणवाद्यांचा विजय होणारच आहे. आजची युवापिढी व आपल्यात असलेली सांस्कृतिक दरी कमी करून समाजाला वाचवायचे असेल, तर मराठा साहित्य हे समजून घेतले पाहिजे. आमच्यात न्यूनगंडाची भावना आहे, ती काढून टाकली पाहिजे. समतावादी- समन्वयवादी धोरणाची अपेक्षा आहे. आम्ही जी भूमिका घेऊन कार्यरत झालो आहोत, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मराठा साहित्यिकांनी, लेखकांनी याबदलाकडे अधिक परिणामकारक रीतीने पाहिले पाहिजे.

या वेळी उद्‌घाटक डॉ. ऑमवेट, परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. खंदारे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरे, आयुक्त सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. लीलाधर पाटील, रामचंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साहित्यिक जयसिंग वाघ यांनी परिचय करून दिला.
समाजाला निकोप साहित्याची गरज - ऍड. खेडेकर
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 24th, 2009 AT 11:05 PM

नागपूर - देशपांडे हॉल अखिल भारतीय मराठा समाज साहित्य संमेलनात उपस्थितांची भव्य गर्दी.

नागपूर - साहित्यामध्ये समाजाला बदलविण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्यिकांनी समाज घडविणारे निकोप लेखन करावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. दोन दिवस चाललेल्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचा आज सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समारोप झाला. यावेळी समारोपीय भाषण करताना त्यांनी वरील मत व्यक्‍त केले.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, अमेरिकेचे विचारवंत डॉ. थॉम वोल्फ, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके,
बाळासाहेब लुंगे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, प्रा. जैमिनी कडू, नितीन सरदार, ज्येष्ठ सत्यशोधक व माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, डॉ. साहेबराव खंदारे, सुमतीदेवी धनवटे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक धवड, आमदार दीनानाथ पडोळे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, पुरुषोत्तम कडू, अनंतदादा चोंदे, विजयकुमार ठुबे, मधुकर मेहकरे आदी उपस्थित होते.
परखड भाषणात ऍड. खेडेकर म्हणाले, जगातील ५८ देशांना तुकाराम माहिती आहे; परंतु आमच्या भारतीयांना तो अजूनपर्यंत समजला नाही. तुकाराम व महात्मा फुले यांच्या विचारांवर अमेरिका व युरोपमध्ये क्रांती होते. तुकारामांचे साहित्य थोर आहे; परंतु फारच कमी घरांमध्ये त्यांचे ग्रंथ आढळतात, ग्रंथ असले तरीही ते आम्ही समजून घेतले नाहीत. त्यांच्या साहित्यावर आज चिंतनाची खरी गरज आहे. संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस चिंतन झाले, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचविले गेले. हीच संमेलनाची खरी फलश्रुती होय.
ऍड. खेडेकर यांनी साहित्यासोबतच आजच्या पत्रकारितेवरही ताशेरे ओढले. पत्रकारांनी भान ठेवून पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी तोंडसुख घेतले. अमेरिका व युरोपसारखे देश संघाला पोसत असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. वोल्फ यांनी आपल्या भाषणातून नागपूरकरांना महात्मा फुले यांचे विचार समजावून सांगितले. समाजक्रांती घडविणारे म. फुले विदेशातील लोकांना फारसे माहिती नाहीत, याचा खेद वाटतो. फुले सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या व सरळ भाषेत हृदयातील भाषा बोलले. फुलेंना सामाजिक क्रांतीचा जनक संबोधत ते म्हणाले, बहुजनांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मुलींच्या उत्थानासाठी ते लढले. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची आज आवश्‍यकता आहे.
महाकवी गायधनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, तुकाराम जगाला माहिती झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले, अभ्यास झाला. फुले, गांधी, आंबेडकरांसारख्या महापुरुषांना विदेशातील अभ्यासक्रमांमध्ये स्थान मिळावे, अशी इच्छा व्यक्‍त केली.
यावेळी प्रा. सुधाकर मोहोड, प्रा. कडू, सुमतीताई धनवटे, माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, प्रा. मा. म. देशमुख, डॉ. वोल्फ, प्रा. पुरके, अशोक धवड यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा. जैमिनी कडू यांनी सत्काराला उत्तर दिले. संचालन प्रा. मीनाश्री पावडे यांनी केले.
--------------------------------
पुरंदरेंना हटवा

मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवडीचा प्रस्ताव आहे. त्याचा विरोध करण्याचा प्रस्ताव संमेलनात सर्वानुमते पारित करण्यात आला.
--------------------------------